
पुणे – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी आज राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होणार आहे. यासाठी आज ठाकरे पुण्यात आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या निवासस्थानी पुणे, मुंबईतील मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे. मात्र पुणे शहराचे माजी मनसे अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) गैरहजर असल्याने पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे .
वसंत मोरे यांनी मनसेला केला रामराम?
गुढीपाडव्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राज ठाकरेंच्या भूमिकेवर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अचानक वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर साईनाथ बाबर यांना पुणे शहराची सूत्र देण्यात आली. त्यावरही वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते.
त्याच कालावधीत इतर राजकीय पक्षाकडून पक्ष प्रवेशाच्या ऑफर आल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर वसंत मोरे यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, हा सर्व घटनाक्रम पाहता राज ठाकरे पुण्यात आले असतानाही वसंत मोरे गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला का हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.