
प्रतिनिधी DNA मराठी टीम
औरंगाबाद – राष्ट्रवादी नवरा आहे, शिवसेना बायको आहे आणि काँग्रेस वऱ्हाडीच्या भूमिकेत आहे अशी टीका अहमदनगरचे खासदार आणि भाजपाचे नेते सुजय विखे ( Sujay Vikhe Patil) यांनी केली महाविकास आघाडी सरकारवर (MVA) केली होती. या टीकेला आता काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांनी उत्तर देत काँग्रेस वऱ्हाडी नव्हे, तर बाप आहे व बापच राहणार असा टोला खासदार सुजय विखे यांना लावला आहे.
Related Posts
नाना पटोले औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले कि लोकांना काँग्रेस पाहिजे. लवकरच काँग्रेस महागाईविरोधी आंदोलन करणार आहे. भाजपने गरज सरो वैद्य मरो, अशी भूमिका घेतली व देशभरात कृत्रिम महागाई केली. काँग्रेसच नव्हे, तर सारा देशच आज अडचणीत असल्याचे पटोले म्हणाले.
पुढे पटोले म्हणाले की सध्या महाराष्ट्रात भाजपतर्फे जनतेचे मनोरंजन सुरू आहे. पण ते ऐकून ऐकून जनतेचे कान बधीर झालेले आहेत. केवळ भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. एकही भ्रष्टाचार सिध्द होत नाही. ‘मातोश्री‘ला सध्या बदनाम करण्याचा डाव सुरू आहे. हे राजकारणासाठी भाजप करतंय. यात मुख्यमंत्र्यांनी कुठे हतबलता दाखवली नाही. नारायण राणे आणि कृपाशंकर सिंग यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच पुढे भाजपमध्ये आले, तर पवित्र झाले, अशी ही भाजपची रीत आहे. आता भाजपने हे राजकारण थांबवावे, गुजरात पॅटर्न बंद करावा, असे आवाहन नाना पटोले यांनी केला आहे. तसेच एमआयएम बरोबर युती करणार का यावर बोलताना पटोले म्हणाले कि एमआयएमने आम्हाला प्रस्ताव दिला नाही.