
मुंबई – आयपीएल 2022 मध्ये गुरुवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात मुंबईचा पराभव झाला. या मोसमात मुंबई इंडियन्सचा हा सलग सातवा पराभव होता. मात्र तरीदेखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई इंडियन्सने आयपीएलचे पहिले सात सामने गमावले आहेत. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने पहिले सात सामने पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आयपीएल २०२२ मध्ये सर्व संघांना एकूण १४-१४ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे जर गणित मांडले तर मुंबई इंडियन्सचे आता सात सामने शिल्लक आहेत आणि ते सर्व जिंकले तर त्यांचे गुण १४ होतील आणि सध्याचा फॉर्म पाहता इतके गुण मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य वाटते. गुणतालिकेमध्ये दोन संघांच्या खात्यात १० गुण आहेत, तर तीन संघांनी आठ गुण मिळवले आहेत.
अशा स्थितीत पाचवेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ सलग दुसऱ्या वर्षी प्लेऑफच्या आधी बाहेर पडू शकतो. त्याच वेळी, चेन्नईचा संघ सामना जिंकला असेल, परंतु उर्वरित सात सामने त्यांच्यासाठीही करा किंवा मरा अशाच परिस्थितीचे असतील.
सात सामन्यांतून दोन विजयांसह सीएसकेच्या खात्यात चार गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट देखील नकारात्मक आहे. अशा स्थितीत संघाला उर्वरित सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करावी लागणार आहे. गुरुवारी मुंबई इंडियन्सने २० षटकांत सात बाद १५५ धावा केल्या आणि सीएसकेने २० षटकांत तेवढ्याच विकेट्स गमावून १५६ धावा करून सामना जिंकला.
तरीही मुंबईजवळ काही पर्याय आहे का?
सलग सातवा सामना गमावल्यानंतर मुंबईचा संघ प्लेऑफमधून जवळपास बाहेर पडला आहे. पण तरी मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र यासाठी मुंबईला उर्वरित सर्व सामने जिंकून आणि उर्वरित संघ हरण्याची वाट पाहावी लागणार आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता हेही अशक्य वाटते.