
सांगली – राज्यात मागच्या काही दिवसांपासून हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंग्यांवरून चांगलाच राजकारण तापला आहे. यातच १ मे रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) औरंगाबाद (Aurangabad) येथे जाहीर सभा घेणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरून राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं. तसेच, “महाराष्ट्रात योगी नसून फक्त सत्तेचे भोगी आहेत” अशा शब्दांत राज्य सरकारवर टीका देखील केली होती. यावरून दावे-प्रतिदावे सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भूमिका मांडली आहे.
सांगलीमध्ये बोलताना अजित पवारांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत इशारा दिला आहे. “उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला म्हणे. घेतला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, दिवाळीचे असे १५ दिवस काढले आहेत. यातले ३ दिवस वेळ वाढवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी आहे. उद्या जर कुठला निर्णय घ्यायचं झालं, तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांबाबत निर्णय घेतला, तर तो इतरही कार्यक्रमांना लागू होईल, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “शिर्डीला साईबाबांची काकड आरती पहाटे ५ वाजता सुरू होते. उद्या त्यातही काही अडचणी येऊ शकतात. आपल्याकडे तर रात्री वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असतात. काही ठिकाणी प्रवचन, कीर्तन असतं. हरिनाम सप्ताह असतो. हे सगळं रात्रीच आपल्या गावांमध्ये असतं. लाऊडस्पीकर चालू असतो. आपण कधी कुणाला बोलत नाही. काही ठिकाणी वाघ्या-मुरळीचे कार्यक्रम चालू असतात”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
आरे बाबांनो, तुम्ही नियम लावायला जर गेलात… तिथे उत्तर प्रदेशमध्ये जो निर्णय झालाय, त्यानुसार आम्हाला माहिती मिळाली आहे की मथुरेमध्ये पहाटेचा लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला. जर एखादी गोष्ट सर्वांच्या संमतीने न त्रास होता होत असेल, तर नवीन प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय? असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.