
प्रतिनिधी DNA टीम
दिल्ली – संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेला हिजाब (Hijab) प्रकरणात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना धक्का देत या प्रकरणात तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा हा विषय आता चर्चेत आला आहे . या प्रकरणात योग्यवेळी सुनावणी होईल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तर न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलाला हिजाब वादाचा परीक्षांशी काहीही संबंध नाही, असंही सांगितलं आहे.
सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा (NV Ramanna) म्हणाले कि “परीक्षांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्याचा उल्लेख करून सनसनाटी निर्माण करू नका.” याआधीही न्यायालयाने हिजाब वादावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता, होळीच्या सुट्टीनंतर यावर विचार केला जाईल असे म्हटले होते. हे प्रकरण गुरुवारी मुख्य न्यायमूर्तींसमोर तातडीने सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी वकील कामत यांनी, ”२८ मार्चपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थीनीस हिजाब घालून प्रवेश दिली नाही तर तिचे एक वर्ष वाया जाईल.” असं न्यायालयात म्हटलं होतं.
तर दुसरकडे याच प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाच्या खंडपीठाने निकाल देत हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, असं सांगितले होते. हायकोर्टाने हिजाबसंबंधी निर्णय दिलेला असतानाही अद्याप वाद सुरूच आहे विद्यार्थी हिजाबवर ठाम आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणात काय निर्णय येणार या कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.