
पुणे – संभाजीराजे (Sambhaji Raje) भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दोन मोठे निर्णय जाहीर केले आहेत. संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर ते कोणता निर्णय जाहीर करणार या कडे संपूर्ण राज्याचा लक्ष लागून राहिले होते.
स्वराज्य संघटनेची घोषणा!
आपल्या दुसऱ्या निर्णयामध्ये त्यांनी एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. “”मला वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. या जनतेला एका छताखाली कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. त्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आजपासून ही संघटना स्थापन झाली आहे”, असं संभाजीराजे भोसले यांनी जाहीर केलं आहे.
राज्यसभा खासदारकीबाबत घेतला मोठा निर्णय
संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. “या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. यावर्षीची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचे हित पाहिलं. त्यामुळे माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणं गरजेचं आहे. जे २९ अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठं मन दाखवायला हवं. फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. मी तुम्हाला नक्कीच भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे. माझ्या कामाची दखल गेऊन तुम्ही मला राज्यसभेत पाठवावं अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. मी आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही”, असं संभाजीराजे भोसले यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.