
प्रतिनिधी – DNA मराठी टीम
मुंबई – भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार 21 आणि 22 एप्रिलला राज्यातली बहुतेक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.
मुंबईतल्या चेंबूर, भांडुप, नाहूर, मुलुंड परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही भागातही पावसानं हजेरी लावली आहे.तसेच पुढील 3-4 तासात पालघर, नाशिक, धुळे आणि नंदूरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे राज्यातील काही भागात सकाळपासूनच ढगाळ आकाश आहे. तर काही भागात हलका पाऊसही सुरु आहे. पश्चिमी चक्रवातामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला होता.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 21 एप्रिलपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मराठवाड्यासह तळकोकणाला या वादळी वाऱ्याचा अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याठिकाणी देखील पुढच्या तीन ते चार तासात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळालासुध्दा वातावरणाचा फटका बसत आहे.