
राणा दांपत्याविरोधात कलम १५३ अ बरोबरच विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून शनिवारी अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रविवारी स्पष्ट झालं. त्यांना रविवारी दुपारी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आलं. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाही गुन्हा असल्याने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती घरत यांनी केली. राणांच्या वतीने त्यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला.
त्यांनी पोलिसांच्या कोठडीला विरोध करताना त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी विनंती केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या वेळी न्यायालयाने तपास अधिकारी आणि वकिलांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितलं आहे. कोरोना चाचणीनंतर नवनीत राणा यांना भायखळा तर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात पाठवण्यात आलं.
आणखी एक गुन्हा
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी आणखी एका गुन्ह्याची नोंद केली आहे. शनिवारी कारवाईसाठी गेलेल्या खार पोलिसांशी राणा दाम्पत्याने अरेरावीची भाषा करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी खार पोलीस ठाण्यातही पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत राणा दाम्पत्यावर पोलिसांनी हुज्जत घालून सरकार कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद केली.