९८६ शेतकऱ्यांना मिळाले ७० लाखांचे अनुदान – घनश्याम शेलार

श्रीगोंदा – तालुक्यातील पूरग्रस्त तसेच अतिवृष्टीग्रस्त ९८६ शेतकऱ्यांचे तत्कालीन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे माघारी गेलेले ७० लाख ४८ हजार ५४४ रुपयांचे अनुदान शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यश आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिली.
याबाबत बोलताना शेलार म्हणाले की, ऑगस्ट २०१९ मध्ये तालुक्यातील अकरा गावांना पुराचा फटका बसला होता. तर नोव्हेंबर २०१९ मध्ये तालुक्यातील दहा गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. या दोन्ही दुर्दैवी घटनांमध्ये एकूण ९८६ शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले होते. परंतु, तत्कालीन तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांच्या हलगर्जीपणामुळे हे अनुदान शेतकऱ्यांना वर्ग करता न ते माघारी पाठविण्यात आले होते. सदर अनुदान शेतकऱ्यांना पुन्हा मिळवून देण्याबाबत अजनुजच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्याचबरोबर माझ्याशी चर्चा केली.
Related Posts
शेलार पूढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे अनुदान माघारी गेल्याची अक्षम्य चूक आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या लक्षात आणून दिली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून तत्कालीन तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांची चौकशी केली. चौकशीमध्ये तहसीलदार पवार दोषी आढळल्याने त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे माघारी गेलेले अनुदान पुन्हा वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या शेतकरी हिताच्या निर्णयामुळे तालुक्यातील ११ गावांतील ७२३ पूरग्रस्त शेतकऱ्यांना ६१ लाख १७ हजार ६४४ रुपयांचे आणि १० गावांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ९ लाख ३० हजार ९०० रुपयांचे अनुदान असे एकूण तालुक्यातील २१ गावांमधील ९८६ शेतकऱ्यांचे ७० लाख ४८ हजार ५४४ रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना पुन्हा वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिली.