राज्यात शाळा दिवाळी नंतर – शालये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई – २१ सप्टेंबरपासून नववी ते १२ पर्यंतच्या शाळा उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी राज्यात शाळा उघडण्यास महाराष्ट्रात नोव्हेंबर महिनाची वाट पहावी लागणार आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे . कोरोनाच्या धास्तीने पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवण्यास पालक राजी नसल्याने हे निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत निर्णय करण्यासाठी शिक्षण विभागाने काल (शुक्रवारी) संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत शुक्रवारी घेतली.
या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातही पसरत असल्याने २१ सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवण्यास पालकही राजी होणार नाहीत, निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीत सुरु होता कामा नयेत. गेल्या वर्षीचे वेतनेतर अनुदान परत गेल्याने सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी ते तातडीने देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
केंद्र सरकारकडून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेत जाण्यास आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून लेखी स्वरुपात परवानगी घेणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना एकमेकांपासून कमीत कमी सहा फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तसेच मास्कची सक्ती, सतत हात धुणे, थुंकण्यास मनाई, आरोग्य सेतू अॅप अनिवार्य आहे. कंटेन्मेंट झोनमधील शाळा उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.