बिहार विधानसभा निवडणूकामुळे महाराष्ट्रावर टीका होत आहे – रोहित पवार

मुंबई – बिहार विधानसभा निवडणूक जवळ आल्याने महाराष्ट्रावर टीका वाढताना दिसत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बिहारमधील नेत्यांकडून महाराष्ट्रावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली जात आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेतेही महाराष्ट्रातील कायदा व्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित करत असून, आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रावर होत असलेल्या आरोपावर उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे की धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजपा सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे फक्त एक उदाहरण झालं. आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार, खून यासारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत,सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात.
आपलं महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभ राहणार सरकार आहे. मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा, अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठराविक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात. बिहार निवडणूक जवळ येताच महाष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले.
आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत,असं रोहित पवार यांनी ट्विट करून विरोधकाला उत्तर दिले आहे. याआधी देखील राजकारणासाठी ‘कुठे नेऊन ठेवला आहे, महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण,माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळे आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत, अस दिसतंय. परंतु आपली जनता सुज्ञ आहे. विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचं काम विरोधकांनी आता बंद करावं. महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही, हे विरोधकाने लक्षात घेतले पाहिजे असे रोहित पवार म्हणाले.