डॉक्टर काफील खान यांची रासुका पासून सुटका

मथुरा –अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टर काफिल खान यांची मथुरा तुरुंगातून काल रात्री सुटका करण्यात आली. उच्च न्यायालयानं तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर काफील खान यांची सुटका रात्री उशिरा झाली. १ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गोविंद माथुर यांच्या खंडपीठानं डॉक्टर काफील यांच्यावर उत्तरप्रदेश सरकारकडून लावण्यात आलेला रासुका रद्द करण्याचे आदेश दिले. सुटकेनंतर डॉ. कफील खान यांनी न्यायपालिकेचे आभार मानतानाच सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
कफील खान यांचं भाषण कोणत्याही अर्थानं द्वेषपूर्ण किंवा दंगल घडवून आणणारं नव्हतं. कफील खान यांच्या भाषणामुळे अलीगढमध्ये शांती व्यवस्थेला कोणताही धोका निर्माण झाला नाही असं म्हणत डॉ. खान यांच्यावरील रासुका रद्द करण्याचे तसेच त्यांची तत्काळ सुटकेचे आदेश सकाळीच न्यायालयाकडून दिले गेले होते. आदेशानंतर खान यांचे नातेवाईक त्यांच्या सुटकेसाठी मथुरा तुरुंगात दाखल झाले. मात्र अधिकाऱ्यांनी आदेश न मिळाल्याचं सांगत खान यांना तात्काळ सोडण्यास नकार दिला. सायंकाळपर्यंत अलीगढ जिल्हा प्रशासनाकडून सुटकेसंबंधी कोणतेही आदेश मथुरा तुरुंगात प्राप्त झाले नव्हते. या मुळे रात्री उशिरापर्यंत डॉ. काफील खान यांची सुटका होत नव्हती. मध्य रात्री मथुरा तुरुंगात आदेश पोचल्यानंतर सुटकेची प्रकिया सुरु झाली.
मी न्यायपालिकेचा आभारी आहे की त्यांनी इतके चांगले आदेश दिले. मी १३८ कोटी देशवासियांचे आभार मानतो ज्यांनी संघर्षात मला साथ दिली’ असं म्हणत सुटकेनंतर डॉ. काफील खान यांनी न्यायपालिकेचे आणि जनतेचे आभार मानले. उत्तर प्रदेश सरकारकडून माझ्यावर खोटा आरोप केला होता . कोणत्याही कारणाशिवाय खटला भरून आठ महिने मला तुरुंगात ठेवले . तुरुंगातही मला पाच दिवसांपर्यंत जेवण आणि पाण्याशिवाय माझा छळ करण्यात आला असं म्हणताना त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच मी उत्तर प्रदेश एसटीएफ (Special Task Force) चे आभार मानतो की त्यांनी मुंबईहून मथुरा आणताना एन्काऊन्टरमध्ये मला मारलं नाही असंही त्यांनी या वेळेत म्हटलंय.