छत्रपती संभाजीराजे यांचे पोलिस भरती बाबत मुख्यमंत्री यांना पत्र

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणला स्थगिती उठण्यापूर्वी राज्यात कोणती ही नोकर भरती करु नये अन्यथा आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना दिला. त्यांनी पुढे म्हटले की संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अश्या अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. मराठा समाज या निर्णयाचा विरोध करणार है माहिती असून सुद्धा तुम्ही पोलीस भरती काढली, हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत आहेत.
मी शासनाला एकच सांगू इच्छितो, की मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे. आणि या लढ्यात सर्व जाती समूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार. जे आरक्षण मिळाले होते, त्या प्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत. आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत, कोणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये.
सध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केली, तर त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे.