कंगना राणावत प्रकरण हे शिवसेनेचंच षडयंत्र;

मनसेचा शिवसेनेवरती आरोप

मुंबई : सद्यपरिस्थितीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनाच कंगना प्रकरण जाणीवपूर्वक वाढवत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. त्यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, आरोग्यचे प्रश्न, मंदिर प्रवेश, बेरोजगारी, मुख्यमंत्री घरीच बसून काम करत असल्याने जनतेत नाराजीचे वातावरण आहे. या सगळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी शिवसेना कंगना प्रकरण मोठं करत आहे, हे शिवसेनेच षडयंत्र आहे, असे देशपांडे यांनी म्हटले.
एरवी कंगनाच्या वक्तव्याला पाच पैशांचीही किंमत दिली जात नाही. अशावेळी तिच्या जाळ्यात अडकण्याएवढी शिवसेना निर्बुद्ध नाही. एका इंग्रजी आणि हिंदी वृत्तवाहिनीचा संपादक शिवसेनेचे वाभाडे काढत असताना गप्प असणाऱ्या शिवसेनेचा आत्ताच उद्रेक का झाला?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. येत्या ९ तारखेला कंगना राणावत मुंबईत येणार असून कंगनाला शिवसेना स्टाईल इंगा दाखवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.