आकाशात उडत कामावर यायचं का , मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला !

कोरोनामहामारीमुळे सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते ,मात्र हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. गेल्या ६ महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील हॉटेल्स सुद्धा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची चिन्हे आहेत. याबाबत राज्य सरकारनेदेखील मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.यावर शिक्कामोर्तब होताच पुढील आठवडय़ात ५० टक्के क्षमतेत उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल-उपाहारगृह व्यावसायिकांच्या संघटनांना सांगितले.
यावरूनच आता मनसेने मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.मनसेने म्हटले आहे की, मुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार आहेत. तिथे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं? असा खोचक सवाल करत मनेसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्रांवर टीका केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले की, उपाहारगृहांमध्ये मास्कचा वापर, हात धुणे, अंतरनियम पाळणे या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे . सुरक्षितता आणि स्वच्छता दोन्ही नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे .