अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचेनिमंत्रण अण्णा हजारे यांनी नाकारले आहे


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे भाजपचे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाकारले आहे. उलट ‘दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई कधी करणार आहे असा सवाल हजारे यांनी भाजपला केला आहे.
भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी हजारे यांना पत्र लिहून भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. हे पत्र प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर हजारे यांनी त्यांना उत्तर पाठविले आहे. या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की,‘तुमचे पत्र वाचून मला वाईट वाटले. तुमचा पक्ष मागील सहा वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे. जगातील सर्वाधिक सदस्य असल्याचा दावा करणारे नेते, मंदिरात १० बाय १२ फूट खोलीत राहणाऱ्या ८३ वर्षीय अण्णा हजारे यांच्यासारखे, ज्यांच्याकडे पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहे, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते. केंद्रात आपल्या पक्षाचे सरकार आहे. दिल्ली सरकारचे अनेक विषयही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सीबीआय, कायदा-सुव्यवस्था, विजिलन्स, दिल्ली सरकारचे पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. जर अशीच परिस्थिती असेल आणि दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? की भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे सर्व दावे निरर्थक आहेत?’ असे प्रश्नच हजारे यांनी उपस्थित केले आहेत.